कचादगड:अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणीही यात्रा 5 दिवस चालत असते. कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला, अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. कचारगड मध्ये असलेली गुहा ही निसर्ग निर्मित असुन आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेत जवळपास 5 हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात. इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे. आदिवासी बांधव दरवर्षी कोया पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. यावेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते.या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, मेघालय आदी 18 राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कचारगडच्या गुहेत आदिवासींचे आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहे. या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्याच प्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आप आपल्या राज्याच्या पंरपरेनुसार आदिवासी नृत्याचे संस्कृतीचे सादरीकरण करतात. त्यामुळे संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच ठरते. या आदिवासी बांधवांच्या यात्रे दरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्व असते. कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रेसाठी तैनात करण्यात येतो.
